रविवार, २५ जून, २०२३

मधुमेहींसाठी आहाराची तत्वे

मधुमेहींसाठी आहाराची तत्वे:-

१. आपल्या रोजच्या आहारातलेच खाद्यपदार्थ खायचे आहेत. कुठलेही फॅन्सी पदार्थ /पावडरी खाण्याची गरज नसते.   डायबेटिसवर कारले/जांभळाच्या बिया व मेथ्या/मेथी अशा पदार्थाने पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल याची खात्री नसते. त्यामुळे संपूर्ण आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. 

२. मैदा/आंबवलेले पदार्थ/साखर/गूळ/गोडपदार्थ रक्तातील साखरेची पातळी भराभरा वाढवतात. म्हणून ते शक्यतो टाळायचे, किंवा अगदी कमी प्रमाणात खायचे. 

३.ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ/नाचणी/वरीचे तांदूळ/मका/राजगिरा/ओट्स् वगैरे धान्ये आणि तृणधान्ये आपल्या शरीराला कार्बोदके देतात. 'एकाच वजनाची'  धान्ये/तृणधान्ये घेऊन त्याचे पदार्थ खाल्ल्यास  रक्तातील साखर कमीजास्त प्रमाणात वाढते. पण त्यात फार तफावत नसते. अर्थात भातामुळे जरा जास्त वाढेल आणि ज्वारी बाजरी मुळे जरा कमी वाढेल. भाकरी किंवा चपाती खाल्ल्यानंतर रक्तातील साखर सर्वसाधारणपणे सारख्याच प्रमाणात वाढणार आहे. भाकरीचे वजन चपातीच्या वजनापेक्षा जास्त असते. रोज पोळी-भाकरीचे  वजन करून जेवणे शक्य नसते. त्यामुळे एका चपातीच्या ऐवजी अर्धी भाकरी खावी. भात पूर्णपणे वर्ज्य करायची गरज नाही. सर्वसाधारणपणे हातसडीच्या बासमती तांदुळाचा, छोटी वाटी भात खायला हरकत नाही. प्रत्येक जेवणात पोळी/भाकरी/भात याचे  प्रमाण कमी असावे. तसेच गोड पूर्णतः वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. पण ते वाटीभर खाण्याऐवजी चमचा-दोन चमचे खावे.

३. मधुमेहींना साखरेच्या ऐवजी गूळ/मध/कृत्रिम स्वीट्नर्स असे पर्याय सुचवले जातात. यामधील कृत्रिम स्वीट्नर्स पूर्णपणे टाळावेत. एकाच वजनाची साखर, गूळ  किंवा शुद्ध मध घेतले तर, यापैकी गुळामुळे रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढते तर शुद्ध मधामुळे कमी प्रमाणात वाढते. त्यामुळे साखरेच्या ऐवजी गूळ खाल्ला तरी चालतो हा एक 'गोड' गैरसमज आहे. साखर कमीतकमी खावी. आणि साखरेला पर्याय म्हणून शुद्ध मध वापरावा, गूळ वापरू नये.

४. 'शुगर फ्री' अशी मिठाई /आईस्क्रीम विकली जातात. ती अतिशय फसवी जहिरातबाजी असते. यामधे गोडी आणण्यासाठी अंजीर, खजूर, जरदाळू, बेदाणे यांचा वापर केला जातो. हे सगळे पदार्थ रक्तातील साखर वाढवतातच. काहीवेळा अशा गोड पदार्थांमधे कृत्रिम स्वीट्नर्स असतात. ते तर मुळीच खाऊ नयेत.

५. प्रत्येक वेळेस जेवताना/खाताना, त्या आहारामधे प्रथिने असतील तर रक्तातील साखर कमी वेगाने वाढते व साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते. त्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी दूध/दही/ पनीर/चीझ/सोयाबीन/कडधान्ये खावीत. मांसाहारी व्यक्तींना अंडी/मासे/मटण हे पर्यायही उपलब्ध आहेत.

६. प्रत्येक जेवणात/नाष्ट्यामधे भरपूर तंतूमय पदार्थ असावेत. यासाठी काकडी, गाजर, टोमॅटो, मुळा, कोबी अशा कच्च्या भाज्या, कमी गोडीची फळे, आणि मोड आलेली कडधान्ये खावीत.

७. आहारात तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ कमीतकमी ठेवावेत. यासाठी दरमहिना दरडोई अर्धा किलोपेक्षा जास्त तेल वापरू नये. साजूक तूप/लोणी दिवसभरात चमचा-दोन चमचे खायला हरकत नाही. बाहेरील पाकीटबंद तळलेले पदार्थ/बिस्किटे शक्यतो घरी आणूच नयेत. त्यामधे तूप-तेल खूप जास्त असते आणि त्यांचा दर्जा चांगला असेल याची खात्री नसते. 

८. सूर्यफूल/शेंगदाणा/करडई/सरकी/मोहरी यापैकी, कुठलेही एक तेल आदलून-बदलून वापरावे. आहारात जवस, तीळ, कारळे, मोहरी व शेंगदाणे यांचा वापर करावा. तसेच रोज मूठभर म्हणजे २० ग्रॅम  'ट्री नटस्' (अक्रोड, बदाम पिस्ता, पाईननट्स) खावेत. 

९. दिवसातून एक किंवा दोन वेळेस भरपेट न खाता, तेवढेच अन्न थोडे-थोडे करून दिवसातून चार ते पाच वेळा खाल्ले तर रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण राहते हे जगन्मान्य आहे. मधुमेहींनी काहीही न खाता उपाशी राहणे योग्य नाही. बटाटा, साबुदाणा कमी प्रमाणात खावा. बटाट्यापेक्षा रताळ्यामधे तंतू जास्त असल्याने ते खाणे जास्त चांगले. 

१०. मधुमेहींच्या आहाराबाबतची ही मार्गदर्शक सूत्रे आहेत. तुम्ही घेत असलेली औषधे, तुम्हाला असलेल्या इतर व्याधी याचा विचार करून तुमचा आहार कसा असावा ते तुमचे डॉक्टर योग्य सांगू शकतात, हे लक्षात घ्यावे. 

 
तळटीप:- मी स्वतः जेस्टेशनल डायबेटिक (गर्भारपणात होणारा डायबेटिस) होते. म्हणजेच मी आज प्री-डायबेटिक आहे. पण
गेली एकतीस वर्षे, गोळ्या औषधांशिवाय मी मधुमेहावर नियंत्रण ठेवलेले आहे. अर्थात याला व्यायामाची जोड आहेच. व्यायामाबद्दल पुढे कधीतरी लिहीन.

डॉ. स्वाती बापट (MBBS, MD, बालरोगतज्ज्ञ)

शनिवार, ५ जून, २०२१

काढा डोळ्यावरची पट्टी!

सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका संध्याकाळी, माझ्या क्लिनिकमध्ये आलेले सर्व पेशन्ट तपासून झाल्यामुळे,  मी अगदी घरी जाण्याच्या तयारीत होते. तितक्यातच, माझे एक जुने पेशंट आले असल्याचे माझ्या सेक्रेटरीने मला सांगितले. मला गडबड असली तरीही क्लिनिकपर्यंत पोहोचलेल्या पेशंटला परत पाठवणे मला योग्य वाटत नव्हते. माझ्या क्लिनिकमध्ये, प्रत्येक पेशंटला एक नोंदणी क्रमांक दिलेला असतो. त्या क्रमांकाच्या कार्डावर मी त्या पेशंटच्या नोंदी (Medical notes ) लिहून ठेवते. या उशिरा आलेल्या पेशंटचे कार्ड शोधण्यात आणखी वेळ जाईल, असा विचार करून, मी सेक्रेटरीला सांगितले की आलेल्या पेशंटला तिने त्वरित माझ्या केबिनमध्ये पाठवावे आणि त्यांचे कार्ड शोधून ते नंतर आणून द्यावे. 

माझ्या केबिनचे दार उघडून माझी पेशन्ट वैष्णवी आणि तिचे पालक आत आले.  जवळजवळ दोन-अडीच वर्षांनंतर वैष्णवी माझ्याकडे आली होती. तिला पाहताच मी अगदी सहजपणे म्हणाले, "अरे वा, वैष्णवी मोठी झाली की! चटकन मी ओळखलंच नाही तिला." [गोपनीयतेच्या हेतूने माझ्या त्या पेशंट मुलीचे मी नाव बदलले आहे] 

माझे ते वाक्य ऐकल्या-ऐकल्या, वैष्णवीची आई घळाघळा रडायलाच लागली. माझ्या बोलण्यात काही चूक तर झाली नाही ना असे मला वाटू लागले. मी वैष्णवीच्या वडिलांना, वैष्णवीला घेऊन बाहेर जायला सांगितले. वैष्णवीची आई आता चक्क ओक्साबोक्शी रडू लागली. मग मात्र हा काहीतरी गंभीर प्रकार असणार याची मला जाणीव झाली.  या मुलीचं लैंगिक शोषण झाले आहे की काय? किंवा तिला काही मानसिक आजार वगैरे झाला आहे की काय? अशा अनेक शंका माझ्या मनात यायला लागल्या. 

वैष्णवीच्या आईला बऱ्याच प्रयत्नानंतर मी शांत केले. 

"नेमकं काय झालंय, हे आता जरा मला सांगाल का ? तुम्ही इतक्या का रडता आहात?" असे मी विचारले.  

वैष्णवीच्या आईने सांगायला सुरुवात केली. "डॉक्टर तुम्हाला आठवतंय का? अगदी दोन-अडीच वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही वैष्णवीला घेऊन तुमच्याकडे यायचो."

"हो, चांगलं आठवतंय." हे बोलणे सुरु असतानाच माझ्या सेक्रेटरीने मला वैष्णवीचे कार्डही आणून दिले होते. त्या कार्डावरील नोंदी बघत मी म्हणाले, "वैष्णवी आता जवळपास साडेसात वर्षांची झाली आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वी मी तिला DPT चा बूस्टर डोस दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही आजच आला आहात."

"हो डॉक्टर.  वैष्णवी त्यावेळी अगदीच बारीक दिसायची. तुम्हाला आठवतंय का? त्यावेळी तिचं वजन फारच कमी वाढायचं याची आम्हाला सतत काळजी होती."

"हो आठवतंय ना. 'तिचं वजन वाढण्यासाठी काहीतरी औषध द्या', अशी गळ तुम्ही सतत घालत होता, हेही मला चांगलंच आठवतंय " 

"पण तुम्ही कधीच वजन वाढायचं औषध दिले नाहीत."

"नाहीच दिलं. आणि त्याला ठोस कारणही होतं. एकतर तिचं वजन तेंव्हादेखील व्यवस्थित वाढत होतं. तिचे वजन व उंची नॉर्मल रेंजमध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगत होते. तिच्या वजन आणि उंचीच्या आलेखावर (growth charts) मी तुम्हांला प्रत्येक वेळेला ते दाखवतही होते. वजन वाढण्यासाठी तिला कुठल्याही औषधाची गरज नाही असेही मी तुम्हाला सांगत आले होते. शिवाय, अशा औषधांचे काही विपरीत परिणामही (side effects) असू शकतात, हे माहिती असल्यामुळे मी स्वतः ती औषधे माझ्या पेशंट्ससाठी कधीच वापरतच नाही."

"हो. डॉक्टर. तुम्ही प्रत्येक वेळी निक्षून सांगत होता. पण आमचंच जरा चुकलं" 

"बरं. पण आता त्याचं काय? आता तिला काय होतंय?" 

"सांगते डॉक्टर. वैष्णवी बारकुडीच होती,आणि तुम्ही तर वजन वाढवण्याच्या औषधांची गरजच नाही असाच सल्ला देत होतात. मात्र, आमचे नातेवाईक, शेजार-पाजारचे, येणारे-जाणारे, सारखे आम्हाला म्हणायचे, 'तुमची वैष्णवी खूपच अशक्त आहे. तिचे वजन वाढण्यासाठी तिला काहीतरी टॉनिक देत जा'. सतत सगळ्यांनी असं  सांगितल्यामुळे आम्हालाही वाटलं की दुसऱ्या कोणाचं तरी औषध करावं. माझ्या शेजारपाजारच्या बायकांनी पुण्याजवळच्या एका वैद्यकीय केंद्राच्या मुख्य डॉक्टरांचे नाव सांगितले. त्या डॉक्टरांची औषधे खूप गुणकारी आहेत असेही त्यांनी संगितले. मग मलाही वाटलं की आपण त्यांचं औषध करून बघावं"

"मग? दिलंत का त्यांचं औषध?"

"हो ना. गेले वर्षभर वैष्णवीला त्यांचेच औषध चालू होते."

"बरं. मग?" 

"आम्ही ज्या डॉक्टरांचे नाव ऐकून गेलो होतो ते स्वतः कधी भेटलेच नाहीत. त्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका डॉक्टरांनी वैष्णवीला तपासले, नाडीपरीक्षा केली, आणि एक महिन्याच्या औषधाच्या पुड्या दिल्या. एक वर्षभर, रोज एक पुडी न चुकता घ्यायची, असे त्यांनी आम्हाला बजावून सांगितले. एकेक महिन्याच्या पुड्या आम्ही तीन-तीन हजार रुपयांना विकत घ्यायचो. न चुकता, आम्ही ती रोजची एक पुडी वैष्णवीला वर्षभर देत राहिलो. ते औषध चालू केल्यावर वैष्णवी भरपूर जेवू-खाऊ लागली आणि तिचे वजनही वाढायला लागले."

"वजन वाढलं असेल तर ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय झाला? माझ्याकडे का आला आहात?" 

वैष्णवीची आई मूळ मुद्द्याकडे येत नसल्याने आता माझा संयम संपत चालला होता. 

"सांगते ना. मागच्या दोन-एक महिन्यात मला जरा काळजी वाटायला लागली. मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं." असं म्हणत पुन्हा त्या बाईंना रडू यायला लागले. 

"अहो रडू नका. शांत व्हा बरं, आणि तिला काय झालंय ते मला नीट सांगा"

"वेगळं म्हणजे... अहो डॉक्टर, ती अजून आठ वर्षांचीही झालेली नाही. पण आत्ताच केवढी मोठी दिसायला लागली आहे. तिची छाती भराभर वाढतेय. काखेत केस यायला सुरुवात झाली आहे. तिला दोन-चार महिन्यातच पाळी येईल की काय, अशी मला भीती वाटतेय."

"अरे बापरे! पण मग तुम्ही ज्यांच्याकडून औषध घेत होतात त्यांना हे सांगितलंय का?'

"हो, डॉक्टर. खरंतर आम्ही आत्ता त्यांच्याकडेच गेलो होतो. तिथून डायरेक्ट तुमच्याकडेच येतोय." 

"बरं. मग त्यांचा सल्ला काय आहे?" 

"डॉक्टर, आम्ही नुसती शंका त्यांना बोलून दाखवली की, 'तुमच्या औषधांमुळे तर असं होत नसेल ना? तर त्यांनी एकदम आरडा-ओरडाच सुरु केला. आम्हाला काय वाट्टेल ते बोलून अक्षरशः तिथून हाकलून लावले."

"आता ते जाऊ द्या. मला आधी एक सांगा की त्यांच्या पुडीतल्या औषधांव्यतिरिक्त गेल्या वर्षभरांत तुम्ही वैष्णवीला इतर काही औषधे देत होतात का? "

"नाही. त्या डॉक्टरांनी आम्हाला बजावून सांगितले होते की, इतर कुठल्याही पॅथीची कुठलीही औषधे घ्यायची नाहीत,त्यांनी दिलेली रोजची पुडी कुठल्याही परिस्थितीत चुकवायची नाही आणि सांगितलेले कडक पथ्य पाळायचे. आम्ही पण त्यांचे म्हणणे तंतोतंत पाळले."  

"बरं. मी आधी वैष्णवीला तपासते आणि तुम्हाला आलेली शंका खरी आहे की नाही याची खात्री करून घेते." असे म्हणून मी वैष्णवीला तपासणीसाठी आत बोलावले. 

दुर्दैवाने, तिची आई म्हणत होती ते खरेच होते. वैष्णवीच्या स्तनांची वाढ, आणि तिच्या काखेत व गुप्तांगावर आलेल्या केसांची वाढ बघता (Sexual Maturity Rating), लवकरच वैष्णवीला पाळी येणार, याची मला खात्री पटली. चेहऱ्यावर अगदी निरागस, बालसुलभ भाव असलेल्या वैष्णवीची ती अवस्था बघून मलाही गलबलून आले.

मी वैष्णवीला बाहेर वेटिंग रूममध्ये बसून पुस्तक वाचायला सांगितले. ती बाहेर गेल्यानंतर, अगदी शांत आवाजात, मी वैष्णवीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले, 

"हे पहा, ही Precocious Puberty, किंवा अकाली पौगंडावस्थेची केस आहे. आपल्याला वैष्णवीच्या काही तपासण्या करून, ती या अवस्थेच्या नेमक्या कुठल्या स्टेजला आहे हे बघावे लागेल. त्याचप्रमाणे, असे कशामुळे झाले असेल, याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. अशा केसेसमध्ये बरेचदा काही कारण सापडत नाही. पण कधीकधी मेंदूत किंवा शरीरात इतरत्र होणाऱ्या गाठीमुळे (tumor) असे होऊ शकते. तसे काही निघालेच, तर त्या गाठीचा इलाज करावा लागतो. शरीरातील ग्रंथींच्या तज्ज्ञांच्या, म्हणजेच Paediatric Endocrinologist च्या सल्ल्याप्रमाणेच पुढील तपासण्या आणि उपचार तुम्ही घेतले तर जास्त योग्य होईल. मात्र, हे सगळे तातडीने करावे लागेल. मी तुम्हाला तशी चिठ्ठी लिहून देते". 

त्यांना मी पुण्यातल्या एका Paediatric Endocrinologist कडे जाण्याचा रेफरन्स लिहून दिला. त्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे, वैष्णवीच्या MRI, X-Ray आणि रक्ताच्या अनेक तपासण्या केल्या गेल्या. सुदैवाने, वैष्णवीच्या मेंदूत गाठ वगैरे काही निघाली नाही. पण तिला हे असे का झाले असावे, याचे कारणही सापडू शकले नाही. वैष्णवीला पाळी लवकर सुरु होऊ नये, यासाठी,  आठ ते दहा हजार रुपये किंमतीच्या एक विशिष्ठ औषधाचे इंजेक्शन, तिला  दर महिन्याला द्यायला सुरुवात केली. त्या नंतर, तिच्या स्तनांची व इतरही लैंगिक अवयवांची अवाजवी वाढ थांबली.  दर तीन-चार महिन्यांनी, पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी अनेक रक्त-तपासण्याही कराव्या लागल्या. वैष्णवी बारा वर्षांची झाल्यावर त्या डॉक्टरांनी ती इंजेक्शन्स बंद केली. त्यानंतर सात-आठ महिन्यांत वैष्णवीला मासिक पाळी सुरु झाली. 

त्या सर्व दिव्यातून पार पडल्यानंतर प्रथमच, वैष्णवीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी तिला माझ्याकडे काही किरकोळ कारणासाठी आणले होते.

आता जवळजवळ चौदा वर्षांची होत आलेली वैष्णवी अगदी छान उंच झालेली दिसत होती. वैष्णवीची तपासणी झाल्यावर, तिच्या आईने जाता-जाता मला एक प्रश्न केला, "मॅडम, मागे जो प्रकार घडला तो सगळा त्या पुडयांमधल्या औषधांमुळेच  झाला असेल ना? "

"मी तसे खात्रीशीरपणे म्हणू शकणार नाही. त्या पुड्यांमध्ये जे औषध होते त्याचे रासायनिक पृथःकरण जर तुम्ही करून घेतले असते तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित तुम्हाला मिळाले असते."  असे उत्तर मी दिले.  

त्यावर वैष्णवीच्या आई अतिशय पोटतिडिकीने म्हणाल्या, "आम्ही शेवटचे जेंव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेंव्हा, त्या महिन्याच्या आमच्या पुड्याही संपलेल्या होत्या. गेल्या-गेल्या आम्ही त्यांना विचारले की, 'तुम्ही देत असलेल्या औषधांमुळे हे असे शारीरिक बदल होत आहेत का?' त्या प्रश्नावर ते काहीतरी सारवासारवीची उत्तरे देऊ लागले. पण तो प्रश्न आम्ही आधी विचारला हीच आमची चूक झाली. कारण, जसे नंतर आम्ही त्यांना म्हटले की, 'वैष्णवीला तुम्ही देत होतात त्या औषधाच्या पुड्या संपल्या आहेत. आता आम्हाला आणखी हव्यात'. तशी त्यांना शंका आली असावी, की आम्ही त्यांची तक्रार करू, किंवा त्यांना कोर्टात खेचू. त्यानंतर मात्र ते आमच्यावर कमालीचे भडकले आणि त्यांचा आरडा-ओरडा सुरु झाला. 'आमची औषधे आम्ही नैसर्गिक वनौषधींपासून तयार करतो. आमच्या औषधांचे काहीही साईड इफेक्ट्स असूच शकत नाहीत. तुमचा विश्वास नाही, तर आमच्याकडे येताच कशाला?' असे म्हणून, त्यांनी आम्हाला तेथून चक्क हाकलूनच लावले. खरंतर मला त्यांचा खूप राग आला होता पण आम्ही मुकाट्याने तिथून निघून आलो."

"त्या पुड्यांपायी आम्ही वर्षभरात ३५-४० हजार खर्च केलेच होते. त्यानंतर, वैष्णवीचे झालेले नुकसान भरून काढता-काढता अक्षरशः आमच्या नाकी नऊ आले. गेल्या चार वर्षांत दिलेली इंजेक्शन्स आणि केलेल्या सर्व टेस्ट्स यांवर आमचे आणखी चार-पाच लाख रुपये खर्च झाले. आजदेखील माझा अगदी संताप-संताप होतो. असं वाटतं की, या फसव्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. पण, त्या पुडीतल्या औषधाचे नाव आम्हाला माहिती नाही, आणि आमच्याकडे त्या औषधाचा नमुनाही नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आमच्याकडे काही पुरावाच नाही. आणि जरी काही पुरावा आमच्याकडे असता तरी, वैष्णवीच्या ट्रीटमेंटचा खर्च केल्यानंतर परत कोर्टाचा खर्च करण्याची आर्थिक ताकदच आमच्यात उरली नसती. त्यामुळे आमचा राग गिळून टाकून, आम्ही कसेबसे स्वतःच्या मनाचे 'आत्मसंतुलन' बिघडू नये, एव्हढाच प्रयत्न करत राहतो." 

वैष्णवीच्या आईचा होणारा तळतळाट मला कळत असला तरीही वैद्यकीय व्यवसायाच्या नीतिमत्तेनुसार (Medical  Ethics) इतर कोणा वैद्यकीय व्यवसायिकांबाबत मी काहीही बोलणे उचित नव्हते.  

एलोपॅथी व्यावसायिकांना  ऍलोपॅथीच्या औषधांचे परिणाम (Effects), दुष्परिणाम (side effets) आणि अगदी टोकाचे दुष्परिणाम (adverse effects) याबाबत माहिती असते. त्या माहितीवर आधारित, कुठले औषध कुठल्या व्याधींसाठी, किती प्रमाणात आणि किती काळ वापरायचे, हेदेखील त्यांना कळते. तसेच, त्या औषधांचे दुष्परिणाम आणि अगदी टोकाचे दुष्परिणाम या बाबतची माहिती सर्वांसाठी खुली असते आणि सहजी मिळू शकते. त्यामुळे, इच्छुक पेशन्ट्स त्याबाबत ऍलोपॅथी व्यावसायिकांना जाब विचारू शकतात. आणि तो त्यांचा हक्क आहे.


दुर्दैवाने, ऍलोपॅथीच्या औषधांच्या उपयुक्ततेबाबत फारसे बोलले जात नाही. मात्र, त्यांच्या दुष्परिणामांची चर्चाच समाजात सातत्याने होत असते. वैष्णवीच्या केसच्या अनुभवानंतर, माझ्या पेशंट्सच्या पालकांना मी काही गोष्टी नीट समजावून सांगते, "तुम्ही ऍलोपॅथी सोडून इतर कुठल्याही पॅथीचे औषध तुमच्या मुलांना देणार असाल तर त्या औषधांची लेखी चिट्ठी अवश्य घेत जा. त्या औषधाचे नाव काय आहे, त्यात काय घटक वापरले आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि तो तुमचा हक्कही आहे. तसेच त्या औषधाचे तुमच्या मुलांच्या शरीरावर काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना, याबाबत जागरूक राहा. तसे काही दिसून आल्यास संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाला त्यासंबंधी विचारणा करणे हाही तुमचा हक्कच आहे. ऍलोपॅथी सोडून इतर पॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम (side effects)  नसतात, असा अंधविश्वास ठेऊ नका. कोणत्याही पॅथीची औषधे घेणार असाल तरी ती डोळसपणे घ्या, इतकेच."

एलोपॅथीप्रमाणेच इतर पॅथींमध्येही अनेक गुणकारी औषधे असतील. मात्र विज्ञानाधिष्ठित चाचण्यांद्वारे ते सिद्ध होणे  आवश्यक आहे. त्या कठोर चाचण्यांना सामोरे जाण्याची मानसिकता सर्वच पॅथीच्या डॉक्टरांमध्ये असायला हवी. तसेच, एखाद्या औषधाचे दुष्परिणाम (side effects) किंवा अगदी टोकाचे दुष्परिणाम (adverse effects) दिसून आल्यास, ते मान्य करण्याचा मोकळेपणादेखील हवा. एखाद्या गुणकारी औषधाच्या परिणामापेक्षा त्याचे  टोकाचे दुष्परिणामच  (adverse effects) जास्त असतील तर, त्या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी यायला हवी. 

या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंक्सवर वाचावेत.  

Be Open ! 

रामदेव?.....जाना देव!

रविवार, ३० मे, २०२१

Be open!

करोना महामारीमुळे सोशल मीडियावर अनेक वादांना तोंड फुटले. राजकीय, सामाजिक विषयांबरोबर आरोग्यसेवा आणि वेगवेगळ्या उपचारपद्धतीचा प्रश्न तर ऐरणीवरच आला. 

खरेतर, कुठल्याच पॅथीमध्ये करोनावर रामबाण इलाज नाही. हे वास्तव ऍलोपॅथी व्यावसायिकांनी प्रांजळपणे मान्य केले. Modern Medicine च्या Evidence-based practice या तत्वाप्रमाणे, जसजशी काही नवीन औषधे लागू पडण्याची शक्यता असल्याचे पुरावे समोर आले, तसतसे नवनवीन औषधे व उपचारपद्धती वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतरही, जेंव्हा-जेंव्हा ऍलोपॅथीची काही औषधे करोना उपचारांसाठी लागू पडत नाहीत हे सिद्ध झाले तेंव्हा त्या औषधांचा वापर बंद करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (World Health  Organization) केल्या. त्यानुसार सातत्याने बदल करत, जगभरातील ऍलोपॅथी व्यावसायिकांनी करोना रुग्णांचे जीव वाचवायची शिकस्त केली. 

जगभरात उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत, इतर देशांमधील जनतेने modern medicine च्या डॉक्टरांच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेऊन, एकजुटीने त्यांना पाठिंबा दिला. भारतात मात्र इतर पॅथीच्या अनेक 'व्यावसायिकांनी' ही संधी साधून ऍलोपॅथीच्या उपचारपद्धतीची खिल्ली उडवणे सुरु केले. अनेक जणांनी, "प्रतिकारशक्ती वाढवणारी", किंवा "करोना न होऊ देणारी", आणि "करोना झालाच तरी त्यातून पूर्ण बरे करणारी", किंवा "करोनावरील एलोपॅथीच्या उपचारांमुळे शरीरावर झालेले दुष्परिणाम घालवणारी", अशी अनेक औषधे बाजारात आणली. एकीकडे ती औषधे खपवून आपली पोळी भाजून घेतलीच. पण, दुसरीकडे, "करोना लसीकरण करू नये, हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर मृत्युमुखी पडण्याचीच शक्यता जास्त आहे", असे काही संदेश व्हिडीओ आणि लेखी पोस्टद्वारे सोशल मीडियामध्ये पाठवून सामान्य जनतेची दिशाभूल करायलाही मागेपुढे पहिले नाही. अशा पोस्टमधून अत्यंत चतुराईने स्वतःची जाहिरातबाजीही त्यांनी करून घेतली. आणि, या सगळ्या प्रकारात 'मिक्सोपॅथी' किंवा 'इंट्रीग्रेटेड मेडिसिन' वापरात असले पाहिजे अशीही चर्चा पुन्हा सुरु झाली. 

एका ग्रुपवरच्या चर्चेमध्ये, "मिक्सोपॅथीला' माझा विरोध आहे" हे मी स्पष्ट केले. त्यावर, उजव्या विचारसरणीच्या माझ्या एका स्नेह्याने, "Come on Swatee, be open. तुम्ही ऍलोपॅथीवाले ना, अजिबात open minded नसता. एक साधा विचार करून मला सांग, हजारो वर्षांपासून आपल्या देशात वापरामध्ये असलेली आयुर्वेदाची उपचारपद्धती चुकीची असूच कशी शकेल?"

"ती उपचारपद्धती चुकीची आहे असं माझे मत नाही. पण, त्या उपचारपद्धतीला अजूनही जगन्मान्यता लाभलेली नाही. Modern Medicine हे Evidence-based practice वर आधारित आहे. यामध्ये सखोल आणि व्यापक चाचण्या करून, तौलनिक संशोधन प्रकल्प राबवले जातात. चाचण्या आणि संशोधनातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या कसोटीवर एखाद्या औषधामुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत हे जोखले जाते. फायदे आणि तोटे यांचा एकत्रित विचार करून एखाद्या औषधाची उपयुक्तता किती आहे आणि अपाय किती प्रमाणात आहे बघितले जाते.  याच निकषांवर इतर कुठल्याही पॅथीच्या औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली तर Modern Medicine, त्यातील गुणकारी घटक वापरून, औषधे तयार करून  वापर करते. We are quite open about it! मात्र, त्यातील काही औषधे त्यांच्या 'side effects मुळे, उपयुक्ततेपेक्षाही अधिक हानिकारक आहेत, असे सिद्ध झाले तर त्या औषधांचा समावेश Modern Medicine मध्ये होत नाही." 

"एखादी उपचारपद्धती व त्यातील औषधे भारतात हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत, आणि नैसर्गिक वनस्पती पासून तयार केली जात असल्यामुळे त्यांचे काहीही 'side effects' नाहीत, हे केवळ बोलून भागणार नाही. व्यापक संशोधन आणि चाचण्यांचे निष्कर्ष दाखवणारे रिसर्च पेपर समोर ठेवून जगभरातील शास्त्रज्ञांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडले पाहिजे. तसे होईपर्यंत सामान्य नागरिकांनीही आंधळेपणाने त्यांवर विश्वास ठेवणे त्यांच्या हिताचे नाही." 

"इतर कुठल्याही पॅथीतील औषधांपेक्षा आमच्या पॅथीत एखादे औषध जास्त चांगले आहे किंवा एखाद्या असाध्य रोगावर आमच्या पॅथीत रामबाण औषध आहे असा दावा करायला काहीच हरकत नाही. पण त्या दाव्याला जगन्मान्यता मिळवण्यासाठी त्या औषधातील घटक निस्संदिघ्नपणे जगासमोर आणायची तयारी हवी. तसेच संशोधनासाठी ते औषध उपलब्ध करून द्यायला हवे. हे करायला इतर पॅथीचे लोक तयार आहेत का?  Are they open for this idea? ते आधी बघ आणि मला सांग." असे मी माझ्या त्या स्नेह्याला सांगितले. 

तो विषय तिथेच थांबला. पण त्या चर्चेमुळे, अनेक वर्षांपूर्वी डॉ.राम गोडबोले सरांच्या हाताखाली मी काम करत असतानाचा एक अनुभव मला आठवला.  

एकदा, जेमतेम तिशीचा एक पेशन्ट गोडबोले सरांकडे तपासणीसाठी आला. त्याच्या अंगातील रक्त खूपच कमी झाल्यामुळे तो पांढराफटक पडला होता. म्हणजेच, त्याला Severe Anaemia झालेला दिसत होता. त्याला कमालीचा थकवाही आला होता. त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना सरांनी काही प्रश्न विचारले. त्याच्या शरीराच्या एखाद्या भागातून, अंतर्गत अथवा बहिर्गत रक्तस्त्राव तर होत नसेल ना, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सरांनी केला. त्याला तपासून झाल्यावर, त्याच्या आजाराचे नेमके निदान करण्यासाठी सरांनी काही चाचण्या लिहून दिल्या. 

त्या दिवशीचे सर्व ओपीडी पेशंट्स तपासून झाल्यावर सरांनी आपला मोर्चा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडे (Pathology Lab) कडे वळवला. त्या तरुणाच्या रक्ताचे बरेचसे रिपोर्ट्स तयार झाले होते. गोडबोले सरांनी स्वतः मायक्रोस्कोपखाली त्याच्या रक्ताची फिल्म बघितली आणि आम्हालाही बघायला सांगितली. त्या तरुणाला, एका प्रकारचा  रक्ताचा कॅन्सर झाला होता. त्यावेळी तरी त्या आजारावर ऍलोपॅथीमध्ये कुठलेही औषध नसल्याने आमच्या दृष्टीने तो असाध्य रोग होता. दोन-चार महिन्यातच त्या तरुणाचा मृत्यू होणे अटळ आहे असे दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सर्व रिपोर्ट्स घेऊन त्या तरुणाचे नातेवाईक आले. सरांनी त्यांना त्या आजाराचे गंभीर स्वरूप समजावून सांगितले. ऍलोपॅथीमध्ये ते दुखणे बरे करण्यासाठी नेमके औषध त्याकाळी उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट केले. हे ऐकताच, गळाठून गेलेल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी विचारले, "आमच्या गावाकडे एक वैद्य आहेत. त्यांच्याकडे असाध्य रोगावर औषधे आहेत असे म्हणतात. त्यांचे औषध आम्ही केले तर चालेल का?"
 
गोडबोले सरांनी त्यांना सांगितले, "मी ऐकून आहे की इतर औषधपद्धतींमध्ये अनेक व्याधींवर गुणकारी औषधे आहेत. पण मला त्याबाबत सखोल ज्ञान नाही. मी मात्र या मुलाचा जीव वाचवायला असमर्थ आहे. या आजारावरचे औषध तुम्हांला इतरत्र कुठेही मिळत असेल तर तुम्ही निश्चित त्याचा विचार करा." त्या नातेवाईकांचे चेहरे पाहून सरांना आणि आम्हा सर्वांनाही खेद वाटला, पण कालांतराने आम्ही सगळेच त्या तरुणाला विसरून गेलो. 

काही महिन्यानंतर तो तरुण परत सरांना दाखवायला आला. तो अगदी व्यवस्थित व सशक्त दिसत होता. आम्ही सगळे आनंदित आणि आश्चर्यचकित झालो. त्या तरुणाच्या रक्ताची तपासणी करून त्याच्या आजाराबाबत शहानिशा करण्याचे सरांनी ठरवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या रक्तात त्या असाध्य रोगाचा मागमूसही दिसून आला नाही. आम्हा सर्वांनाच त्या वैद्यांच्या उपचारपद्धतीबद्दल आणि औषधांबद्दल कमालीचा आदर आणि कौतुक वाटले. सरांनी त्या वैद्यांसाठी एक पत्र लिहून त्या तरुणाजवळ दिले. त्या पत्रात सरांनी त्या वैद्यांचे आभार मानले होते. तसेच, त्यांनी कोणती औषधयोजना केली ते सांगावे व औषधांचे नमुने पाठवावे अशी विनंतीही केली होती. त्या औषधांवर संशोधन करून प्रसिद्ध केल्यास अशा प्रकारच्या सर्वच रुग्णांना जीवनदान मिळू शकेल, असेही सरांनी लिहिले होते. 

मोठ्या आतुरतेने आम्ही सगळेच त्या वैद्यबुवांच्या उत्तराची आणि औषधांच्या नमुन्याची वाट बघत होतो. काही दिवसांतच तो तरुण वैद्यबुवांचा निरोप घेऊन आला. वैद्यबुवांनी त्यांची उपचारपद्धती सांगण्यास आणि औषधांचे नमुने पाठवण्यास साफ नकार दिला होता. त्यानंतरही, सरांनी अनेक प्रकारे त्या वैद्यबुवांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. वैद्यबुवांनी पाळलेल्या त्या गुप्ततेचे कारण कळू शकले नाही, पण त्याबद्दल हळहळ मात्र आम्हाला वाटत राहिली. 

माझ्या स्नेह्याशी पुन्हा झालेल्या संभाषणात मी त्याला हा प्रसंग सांगितला. 
"आपल्या देशातील पारंपरिक औषधपद्धतीला जगन्मान्यता मिळावी असे मलाही वाटते. पण त्या पद्धतीमधील औषधे गुणकारी आहेत हे निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्याकरिता, त्या पद्धतीमधील सर्व औषधे संशोधनासाठी उपलब्ध व्हायला हवीत ना? काही पारंपरिक औषधांची उपयुक्तता जगन्मान्य झालेली आहे. उदा: (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3560124/
तसेच, काही औषधे Modern Medicine च्या औषधांसोबत वापरल्याने रोगावर अधिक चांगला परिणाम होतो असेही संशोधनांती सिद्ध झालेले आहे. उदा: (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/23125511/). 
काही औषधे मात्र आरोग्याला हानिकारक आहेत, हे देखील संशोधनाद्वारे कळलेले आहे. उदा: (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31641694/)"
 
एवढे सांगून मी माझ्या त्या स्नेह्याला स्पष्टपणे विचारले, "आम्ही ऍलोपॅथीवाले Open-minded नसतो, हे तुझे म्हणणे खोडून काढण्यासाठी यापेक्षा अधिक सबळ युक्तिवाद काय असू शकेल? We are quite open. But, are  the others open too?"

इतर पॅथीमधील काही व्यावसायिक आजही आपल्या उपचार व औषधांसंबंधी गुप्तता पाळत असल्याचे एक उदाहरण, काही वर्षांपूर्वी माझ्याच एका पेशंटमुळे माझ्यासमोर आले होते. त्याबद्दल मी लवकरच सांगेन. 

तोपर्यंत वाचकांनी अधिक शास्त्रोक्त माहितीसाठी खालील लिंक जरूर वाचावी. 

गुरुवार, २७ मे, २०२१

रामदेव?.....जाना देव!

ही  गोष्ट आहे १९८६ सालची. ऍलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन मधील माझ्या गुरूंच्या, म्हणजेच सोलापूरच्या सुप्रसिद्ध डॉ. राम  गोडबोले सरांच्या हाताखाली, त्यावेळी शिकाऊ डॉक्टर म्हणून मी काम करत होते. 

सोलापूरमधील वाडिया धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गोडबोले सर मानद फिजिशियन होते. रोज सकाळी ९-९.१५ पर्यंत सर हॉस्पिटलमध्ये पोहोचत असत. सर्वप्रथम, त्यांच्या नावावर भरती झालेले वॉर्डमधील सर्व रुग्ण ते तपासत. त्यानंतर, ओपीडीतले रुग्ण तपासायला सुरुवात करत. त्यांच्या रोजच्या ओपीडीला जवळपास तीस-पस्तीस पेशन्ट्स असायचे. प्रत्येक पेशंटला पुरेसा वेळ देऊन तपासण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या हाताखाली एकावेळी आम्ही तीन चार शिकाऊ डॉक्टर्स काम करत असू. 

एक रुग्ण तपासून झाला की त्याच्या रोगाचे निदान काय व औषधयोजना कशी असावी, हे सर आम्हाला तोंडी सांगत असत. त्यानंतर सर पुढील रुग्णाला तपासायला सुरुवात करत. सरांच्या तोंडी सूचनांप्रमाणे औषधांची चिट्ठी लिहून द्यायचे काम आम्ही शिकाऊ डॉक्टर आळीपाळीने करत असू. लिहून दिलेली औषधे त्या-त्या रुग्णाने विकत आणून सरांना दाखवली पाहिजेत असा सरांचा आग्रह असे. आपल्या सूचनांप्रमाणे योग्य ती औषधे चिट्ठीत लिहिली गेली आहेत आणि केमिस्टनेही त्या चिट्ठीप्रमाणेच औषधे  पेशन्टला दिली आहेत याची खात्री सर करून घेत असत. तसेच, ती औषधे घेण्याबद्दलच्या सूचनाही सर स्वतःच पेशंटला देत असत.  

एके दिवशी एका रुग्णाने केमिस्टकडून आणलेली औषधे पाहताच सर जरा अस्वस्थ झालेले दिसले. सरांनी स्वतः त्या पेशंटकडे दिलगिरी व्यक्त करून सांगितले की एक औषध नजरचुकीने लिहिले गेले आहे. शिकाऊ डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी सरांनी स्वतःकडेच ठेऊन घेतली, आणि चुकीने लिहिलेले ते औषध वगळून, इतर सगळी औषधे स्वतः लिहून रुग्णाला नवीन चिट्ठी दिली. ती औषधे कशी घ्यायची ते समजावून सांगितले आणि त्या पेशंटची बोळवण केली. 

संपूर्ण ओपीडी संपल्यावर, इतर शिकाऊ डॉक्टर्सना जायला सांगून सरांनी मला एकटीलाच ओपीडीत थांबायला सांगितले. त्यानंतर, त्या रुग्णाला आधी दिलेली औषधांची ती चिट्ठी माझ्या हातात देत अगदी शांत आवाजात सरांनी मला विचारले, 

 "हे अक्षर तुझे आहे का?"

 सरानी समोर धरलेल्या कागदाकडे पाहत, ते अक्षर माझेच असल्याची कबुली मी दिली. 

"हे जे शेवटचे औषध लिहिले आहेस ते मी सांगितले नव्हते."

"हो. तुम्ही सांगितले नव्हते सर. पण, तो पेशन्ट म्हणाला की तो रोज ते औषध घेतो. त्याने विनंती केली म्हणून मी ते लिहिले. "

"औषधशास्त्र (Pharmacology) या विषयामध्ये या औषधाबद्दल तू काही शिकली आहेस का? "

"नाही सर. कारण, ते औषध ऍलोपॅथीचे नाहीये." 

"मग ही गोष्ट माहिती असूनदेखील तू ते औषध का लिहिलेस?  एक लक्षात ठेव, ज्या पॅथीचे आपण शिक्षणच घेतलेले नाही त्या पॅथीचे कुठलेही औषध लिहायचा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही. शिवाय, तसे करणे अनैतिकही आहे. तसेच, एखाद्या ऍलोपॅथीच्या औषधाबद्दलही आपल्याला संपूर्ण आणि निश्चित माहिती नसल्यास, ते औषध कधीही लिहायचे नाही." 


इतर पॅथीचे औषध लिहून देण्यातले संभाव्य धोके सरांनी मला विस्ताराने सांगितले. ऍलोपॅथी शिकताना, फार्माकोलॉजी विषयामध्ये प्रत्येक औषधाचा तपशीलवार अभ्यास केला जातो. ते औषध कसे द्यायचे, कोणकोणत्या व्याधींसाठी वापरायचे, किती प्रमाणात, व किती काळ ते औषध घेतले तर ते उपयुक्त असते, कमी वा जास्त प्रमाणात, किंवा कमी वा जास्त काळ घेतले तर रुग्णाला काय धोका निर्माण होऊ शकतो,  त्या औषधाचे एकंदर परिणाम (effects) व दुष्परिणाम (side-effects) कोणते, त्या औषधांबरोबर इतर काही औषधे घेतल्यास, त्यामुळे त्यांचे होणारे  एकत्रित परिणाम (drug interactions), अशा सर्व बाबींचे सखोल अध्ययन केल्यामुळे, त्यांची पूर्ण जाण ऍलोपॅथी डॉक्टरला होते. मुख्य म्हणजे, ऍलोपॅथीच्या औषधांबाबतची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध असल्याने रुग्ण स्वतःदेखील ती वाचून जाणून घेऊ शकतो. त्याबाबत रुग्णाने ऍलोपॅथी डॉक्टरला काही विचारले तर त्याचे शंकानिरसन तो डॉक्टर करू शकतो. परंतु, इतर पॅथीच्या औषधांबाबत ऍलोपॅथी डॉक्टर अनभिज्ञ असतो. त्यामुळे इतर पॅथीचे औषध आपण लिहिणे हे न्यायवैद्यकीय (Medico-Legal) दृष्टीनेही अतिशय अयोग्य व धोकादायक आहे हे सरांनी मला समजावून दिले. 

कायद्याच्या नजरेतून, हाताखालच्या शिकाऊ डॉक्टरच्या चुकीची सर्व जबाबदारीही वरिष्ठ डॉक्टरांचीच असते (vicarious liability ) हेही त्यांनी मला अगदी शांतपणे समजावून सांगितले. ती औषधाची चिठ्ठी मी सरांच्या वतीने लिहिलेली असल्याने, मला संपूर्ण घटनेचे गांभीर्य समजले आणि, "यापुढे कधीही माझ्याकडून अशी चूक होणार नाही" अशी ग्वाही मी सरांना दिली. 

पुढील महिन्यात तोच पेशन्ट परत सरांकडे तपासणीला आला. यावेळीही औषधांची चिठ्ठी मीच लिहून दिली. त्या पेशंटच्या आग्रहाला बळी न पडता, तो नेहमी घेत असलेले ते दुसऱ्या पॅथीचे औषध चिठ्ठीत लिहिण्यास मी नकार दिला. तसेच, ते औषध सरांना विचारल्याशिवाय घेत जाऊ नका असेही मी त्या पेशंटला खडसावले. सरांना औषधे दाखवत असताना त्या पेशंटने विचारले, "डॉक्टर, अमुक-अमुक डॉक्टरांनी लिहिलेले तमुक-तमुक औषध मी नेहमी घेतो. तुम्ही दिलेल्या औषधांसोबतच त्या डॉक्टरांनी दिलेले ते औषध मी घेतले तर चालेल का?"  

या प्रश्नावर वर सर काय उत्तर देतात हे ऐकण्याची मला कमालीची उत्सुकता होती. 

सरानी अगदी शांतपणे सांगितले, "त्या औषधाबाबत मी काहीही बोलणार नाही. मी लिहून दिलेली सगळी औषधे  समजावून सांगितल्याप्रमाणे नियमित घ्या. त्याबरोबर इतर कोणी दिलेले कोणत्याही पॅथीचे औषध घ्यायचे किंवा नाही ते तुमचे तुम्हीच ठरवा."  

माझा अगदीच विरस झाला. मला वाटले होते की सर म्हणतील, "ते इतर पॅथीचे औषध अजिबात घेऊ नका. त्या औषधांचे काहीही दुष्परिणाम असू शकतात. मी दिलेल्या औषधांसोबत इतर पॅथीचे औषध घेतलेत तर तुमच्या नकळत त्या दोन्ही औषधांचा मिळून तुमच्या शरीरावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तसे काही झालेच तर त्याची जबाबदारी माझी नाही." वगैरे ... 

पण, असे काहीच सरांनी त्या रुग्णाला सुनावले नाही. सरांनी मला जे सांगितले आणि त्या रुग्णाला जे सांगितले या दोन्ही गोष्टींमधील तफावत मला चांगलीच खटकली. 

एक प्रश्न लगेच माझ्या मनात आला. "सर, तुम्ही दिलेल्या औषधांसोबत ते दुसऱ्या पॅथीचे औषध पेशंटने घेऊ नये असे तुम्ही त्याला का सांगितले नाहीत?" पण, सरांना तो प्रश्न विचारायची हिंमत मला तेंव्हा झाली नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रसंग आणि मला पडलेला तो रास्त प्रश्न माझ्या मनांतच घोळत राहिले.  

गोडबोले सर म्हणजे माझे सख्खे काकाच होते. हॉस्पिटलमध्ये जरी आमचे गुरु-शिष्या असे औपचारिक नाते असले तरी घरामध्ये आम्ही काका-पुतणीच होतो. त्यामुळे, एकदा आम्ही दोघेही घरी असताना मी संधी साधली आणि आप्पांना, म्हणजे डॉ. राम गोडबोले सरांना माझ्या मनातली शंका विचारलीच. 

"आप्पा, आपल्याच पॅथीची, पण आपण नीट न अभ्यासलेली औषधेही आपण कधीही लिहायची नाहीत हे तुम्ही मला सांगितले. तसेच, इतर पॅथीची औषधे लिहून देण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार आपल्याला नाही, हेही तुम्ही मला निक्षून सांगितले. वेगवेगळ्या औषधांचा परस्परसंबंध (drug  interactions), आणि त्यांचा रुग्णाच्या शरीरावर होणारा एकत्रित परिणाम (side effects due to drug interactions) कदाचित विपरीतही असू शकतो, हेही मला समजले. पण मग, तुम्ही तसे त्या पेशन्टला, समजावून का नाही सांगितलेत? आपल्या औषधासोबत ते दुसऱ्या पॅथीचे  औषध तो घेत राहिला आणि त्या औषधाचे काही घातक परिणाम झाले तर? किंवा तुम्ही दिलेल्या औषधांचा अपेक्षित परिणाम झालाच नाही, तर त्या गोष्टीला आपण जबाबदार राहणार नाही का? "

आप्पांनी  त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने स्मितहास्य करत उत्तर दिले,

"स्वाती, फारच चांगला प्रश्न विचारलास. आपण लिहिलेल्या औषधांबरोबर, इतर पॅथीची औषधे पेशंटने चालू ठेवली आणि नेमका काही विपरीत परिणाम झालाच, तर त्याची जबाबदारी आपल्यावर नसते. कायद्याच्या दृष्टीने, केवळ आपण लिहून दिलेल्या चिठ्ठीमधील औषधांच्या परिणामांना आपण जबाबदार असतो. त्यामुळेच, पेशंट्सच्या केसपेपर्सवर, किंवा आपण लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीवर, अथवा एखाद्या रिपोर्टवर, किंवा आपण दिलेल्या वैद्यकीय मतामध्ये (medical opinion) आपण जे लिहितो त्यात काही चूक होणार नाही, यासाठी आपल्याला दक्ष राहावे लागते. कारण, या सर्व लिखित गोष्टींचे उत्तरदायित्व सर्वस्वी आपल्यावर असते. इतर पॅथीची औषधे घेतल्यामुळे आपल्या पॅथीच्या औषधांचा अपेक्षित परिणाम पेशंटच्या शरीरावर न होणे असेही क्वचित घडू शकते. परंतु, त्याचीही  जबाबदारी आपल्यावर नसते."

आप्पांचा मुद्दा मला मनापासून पटला. परंतु, "दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरने लिहिलेले ते औषध बंद करायला तुम्ही त्या पेशंटला का नाही सांगितले? पेशंटच्या दृष्टीने ते हिताचे नव्हते का?" हा माझ्या मनातला प्रश्न अनुत्तरितच राहिल्यामुळे मी तो परत विचारलाच. 

"मला सांग स्वाती, स्वतःच्या हिताचा विचार स्वतः पेशंटनेच करायला नको का? इतर पॅथीच्या डॉक्टरांनी लिहिलेली औषधे बंद करा, असे सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. त्याचप्रमाणे, आमची पॅथी व त्यातील तंत्रज्ञान इतर पॅथीपेक्षा सरस आहे,  किंवा इतर पॅथी प्रतिगामी आहेत, असेही बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. जोपर्यंत, सर्व पॅथींचा तौलनिक अभ्यास होऊन, त्यांची योग्यायोग्यता जगन्मान्य होत नाही, तोपर्यंत आपण त्यावर भाष्य करायचे नाही. ते वैद्यकीय नीतिमत्तेच्या नियमांत (Medical Ethics) बसत नाही."  

"पण अप्पा, इतर अनेक पॅथीज् चे  लोक त्यांची औषधे "साईड इफेक्ट्स विरहित" असल्याचा दावा करतात. त्यांच्या काही औषधांमध्ये वापरलेले घटक व त्यांचे दुष्परिणाम कुठेही लिखित स्वरूपात नसतात. त्यातील काही  डॉक्टर्स बरेचदा स्वतःच औषधे बनवून त्याच्या पुड्या किंवा बाटल्या पेशंटला देतात. त्या औषधांमधील नेमके घटक कोणते, या बाबत पेशंट अनभिज्ञ असल्याने प्रकृतीवर होणारे परिणाम वा दुष्परिणाम काय असू शकतात हे पेशंटला समजत नाही. शिवाय, इतर पॅथीचे काही डॉक्टर्स अगदी कॉलरापासून ते कॅन्सरपर्यंत, प्रत्येक आजारावर त्यांच्याकडे रामबाण इलाज आहे असा दावा करतात. कहर म्हणजे, इतर पॅथीचे कितीतरी डॉक्टर्स  सर्रास ऍलोपॅथीची औषधे लिहून देतात. ऍलोपॅथीची अनेक अनावश्यक औषधे, बरेचदा चुकीच्या प्रमाणात दिली जातात, ऍलोपॅथीच्या औषधांच्या गोळ्याच कुटून चूर्ण म्हणून, किंवा पाण्यात विरघळवून त्याचे पातळ औषध करून पेशंट्सना दिली जातात. त्याउपर, "ऍलोपॅथीच्या औषधांचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे ऍलोपॅथीची औषधे घेऊ नका" असा अपप्रचारही सर्रास केला जातो. हे तरी कुठल्या नियमात आणि नीतिमत्तेत बसते?" 

"त्याचा विचार तू का करतेस? आपण स्वतः योग्य त्याच गोष्टी कराव्या. जे लोक कायद्याच्या चौकटीत न बसणारे काहीतरी करीत असतील त्यांनाच त्याची चाड व भीती असायला हवी ना? तीच बाब नीतिमत्तेची. त्याचाही सारासार विचार त्यांनीच करावा. आपण नव्हे."  

आपापल्या पॅथीप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी, दिलेल्या सल्ल्याचे उत्तरदायित्व आणि वैद्यकीय नीतिमत्ता पाळण्याची बुद्धी, याबाबत माझ्या गुरूंनी दिलेले ते धडे माझ्या मनावर ठसले. संस्कारक्षम वयात मिळालेला हा ज्ञानाचा डोस, माझ्या आजपर्यंच्या वैद्यकीय व्यावसायिक आयुष्यात मला पुरून उरला आहे. मला माहिती नसलेले औषध मी आजवर कोणालाही लिहून दिलेले नाही. तसेच इतर कुठल्याही पॅथीचे औषध मी कधीही लिहिले नाही. 

माझ्या एखाद्या पेशंटने, "तुमच्या औषधांबरोबर इतर कुठल्या पॅथीचे औषध घेतले तर चालेल का?" असे विचारले तर माझे उत्तर ठरलेले असते. "त्या पॅथीतील औषधांबाबत मी काहीही जाणत नाही. ते घ्यायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा" 

करोना महामारीच्या ऐन भरात, मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर झटत असताना, ऍलोपॅथीवर जाहीरपणे तोंडसुख घेणाऱ्या एका 'महान' व्यक्तीचे वक्तव्य एकून ऍलोपॅथीचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांचा तिळपापड होणे स्वाभाविक होते. 

गोडबोले सर आज हयात असते, तर या खोडसाळ अपप्रचारावर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असती? हा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. 

जरा विचार केल्यावर वाटले, की गोडबोले सर कदाचित म्हणाले असते... 

"प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने आपापल्या पॅथीच्या ज्ञानावर आधारित रुग्णसेवा करावी. ज्या पॅथीबद्दल आपल्याला ज्ञान नाही त्यावर भाष्य करायला जाऊ नये. ज्याने-त्याने आपापली व्यावसायिक नीतिमत्ता सांभाळावी. इतर कोणीही व्यक्ती, अगदी कितीही हीन पातळीवर जाऊन आपल्या पॅथीबाबत काहीही बोलली तरी, त्या वक्तव्यावर भाष्य न करता अशा व्यक्तींना अनुल्लेखाने मारावे."

तरीदेखील, पेशंट्सनी अशा प्रसंगी काय करावे हा प्रश्न उरणारच. त्यांनी एका उपचारपद्धतीवर विसंबून राहावे, की आंधळेपणाने दोन-तीन पॅथीचे उपचार एकत्रित करावे? 

यावरही कदाचित गोडबोले सर म्हणाले असते, "रुग्ण सूज्ञ असेल तर, त्याचा विश्वास असलेल्या एका पॅथीचेच औषधोपचार घेईल आणि कुठल्याच बिनबुडाच्या टीकेवर विश्वास ठेवणार नाही. "  

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

अंजन!

सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माझ्या दोन्ही हाताना Carpal Tunnel Syndrome या दुखण्याने ग्रासले होते. हाताच्या नसांवर मनगटाच्या भागात दाब पडत असल्याने माझ्या दोन्ही हातांची बोटे कमालीची दुखायची, आणि बोटाना झिणझिण्या यायच्या. पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनगटाच्या नसेवरचा दाब कमी करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रियेसाठी मला कमांड हॉस्पिटलच्या फॅमिली वॉर्डात (स्त्रिया व मुलांसाठीच्या) भरती करण्यात आले. तिथे एका मोठ्या लांबलचक बॅरॅकमध्ये अनेक स्पेशल रूम्स होत्या. प्रत्येक खोलीमध्ये दोन रुग्ण ठेवण्याची सोय होती. माझ्या खोलीत शेजारच्या खाटेवर कोणीही रुग्ण स्त्री नव्हती.

मला जनरल अनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया केली गेली. शुद्ध आली तेंव्हा मी माझ्या खोलीत परत आलेले होते. शस्त्रक्रिया झालेल्या माझ्या डाव्या मनगटावर एक मोठा जड स्प्लिंट बांधलेला होता. हाताला कमालीचा ठणका जाणवत होता. जनरल अनेस्थेशिया देताना माझ्या घशातुन श्वासनलिकेत घातलेली नळी जरी काढली असली तरी माझा घसा खूप दुखत होता. हातपाय जड होऊन सगळे शरीर निष्प्राण वाटत होते. उजव्या हाताला सलाईन लावलेले असल्याने तो हात हालवता येत नव्हता व दुखतही होता. एकुणात काय, शस्त्रक्रिया जरी लहानशीच असली तरीही मला खूपच त्रास जाणवत होता.  

संध्याकाळचे जेवण सातपर्यंत उरकले. तोपर्यंत माझ्या उजव्या हाताला लावलेली सलाईनची नळीही काढली गेली होती. इतक्यातच, फॅमिली वॉर्डात एक नवीन ऍडमिशन आल्याचे कळले. ऍडमिट झालेल्या त्या बाईंना नेमके माझ्याच खोलीत शेजारच्या पलंगावर ठेवण्यात आले. माझ्या दिमतीला आनंद दिवसभर थांबला होता. आर्मी हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे रात्रीच्या वेळी त्याला तिथे थांबण्यास मनाई होती. पण खोलीत मी एकटीच रुग्ण असल्यामुळे, विशेष परवानगी घेऊन, रात्री उशिरापर्यंत तो माझ्यासोबत थांबणार होता. त्यामुळे मला जरा आधार वाटत होता. पण, खोलीत दुसरी स्त्री रुग्ण आल्यामुळे त्याला लगेचच घरी परतावे लागले. नेमकी माझ्याच खोलीत ही बाई का उपटली असे वाटून माझी मनोमन खूप चिडचिड झाली.

नवीन आलेल्या बाईचे व तिच्या सैन्याधिकारी नवऱ्याचे, तेथील नर्सिंग ऑफिसर आणि डॉक्टर्सबरोबर चाललेले बोलणे माझ्या कानावर पडल्याने तिच्याबाबत काही माहिती मला आपसूकच कळली. काही दिवसांपूर्वी अचानक त्या बाईंच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. पुढील  उपचारासाठी त्यांना गोव्याहून पुण्याला आणले होते. बाईंना मदत करायला  त्यांच्याबरोबर एका आयाही आली होती. पण आर्मी हॉस्पिटलच्या कडक सुरक्षा नियमानुसार, तिलाही या रुग्ण बाईंबरोबर राहता येणार नव्हते. पोलीस व्हेरिफिकेशन झालेल्या व इतर सुरक्षा तपासणी पार पडलेल्या काही ठराविक आयांचे दूरध्वनी क्रमांक नर्सिंग ऑफिसरने त्या अधिकाऱ्याला दिले. "यांच्यापैकी कोणालाही रात्रीच्या वेळी रुग्णसेवेसाठी बोलवून घ्या" असे सांगून नर्सिंग ऑफिसर निघून गेली. 

त्या अधिकाऱ्याने एकेक करून सगळ्या आयांशी संपर्क साधला. पण त्यापैकी एकही आया त्या रात्री येऊ शकत नव्हती. अचानक आलेले अंधत्व, प्रवासाचा शीण, नवीन जागा आणि कोणी मदतनीसही नाही, अशा अवस्थेत बायकोला सोडून जाणे त्या अधिकाऱ्याच्या जीवावर आले होते. नऊ-साडेनऊ होत आले होते. "रुग्णांना काही मदत लागली तर आम्ही ती करतोच" असे सांगून, रात्रपाळीच्या नर्सिंग ऑफिसरने त्या अधिकाऱ्याला  रात्री हॉस्पिटलमध्ये थांबता येणार नाही याची कल्पना दिली. त्यामुळे त्याला आता निघणे भागच होते. सगळी परिस्थिती बघून माझे मन हेलावले. आतून कितीही इच्छा झाली तरी, मला स्वतःलाच  इतका त्रास असताना मी या बाईंना कितपत मदत करू शकेन याबाबत मी साशंकच होते. तरीदेखील, "तुमच्या पत्नीला रात्रीतून काही मदत लागली तर मी करेन" असे आश्वासन मी त्या अधिकाऱ्याला दिले. तो निश्चिन्त होऊन निघून गेला. 

मध्यरात्री मला त्या बाईंची हाक ऐकू आली. त्यांना लघवी करायला जायचे होते. नर्सिंग ऑफिसरला बोलावण्यासाठी एक दोन वेळा बेल वाजवूनही कोणी न आल्याने, नाईलाजास्तव त्या बाईंनी मला हाक मारली होती. मी उठून त्यांना घेऊन गेले. सकाळी त्यांना ब्रश करायला व इतर आन्हिके उरकायलाही मदत केली. चहा दिला. मला वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे त्या बाईंची दृष्टी  पुन्हा पूर्ववत होणार नाही याची मला कल्पना आलेली होती. त्यांच्या आजारासमोर माझे दुखणे मला अगदीच हलके वाटू लागले. पुढचे दोन दिवस मी त्यांना जमेल तशाप्रकारे मदत केली. 


या घटनेने माझ्या डोळ्यांत जणू अंजनच घातले. आपले दुखणे, आपल्या अडचणी, यांचा आपण फारच बाऊ करत असतो. प्रत्यक्षांत, आपल्यापेक्षाही जास्त कठीण प्रसंगातून अनेकजण जात असतात. त्यांच्याकडे डोळे उघडून पाहिले तरी आपला त्रास कमी होऊ शकतो. स्वतःला वाटते त्यापेक्षा खूप जास्त ताकद आपल्या शरीरात असते. पण मनाने जर खचून गेलो तर आपण शरीरानेही दुबळे बनतो. अशा प्रसंगी मनाने उभारी घेऊन, आपण इतरांना सहजी मदत करू शकतो.  

हीच शिकवण करोना महामारीच्या काळात मला पुन्हा मिळाली. अगदी स्वतः आजारी असतानाही, माझ्यापेक्षा जास्त आजारी असलेल्या काही आप्तांना मी थोडीफार मदत करू शकले. आजही आपल्या आसपास, घरोघरी करोनाचे रुग्ण आहेत. त्यांना जर आपण यथाशक्ति मदत केली तर आपल्या सकारात्मक ऊर्जेची लाट करोनाच्या लाटेवर निःसंशय मात करू शकेल असा मला विश्वास वाटतो.  

शुक्रवार, ५ मार्च, २०२१

कोव्हीड कमांडोज!

मी आणि आनंद काही दिवसांपूर्वी कोव्हीड न्यूमोनियातून बाहेर पडलो आहोत. आधी मला लागण झाली त्यामुळे मला दवाखान्यात भरती व्हावे लागले. माझ्यापाठोपाठ बरोबर तीन दिवसानी आनंदला ताप आला आणि दिवसेंदिवस तो ताप वाढत चालला होता. त्याची कोव्हीड टेस्टही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आता त्यालाही दवाखान्यात राहून उपचार घेणे आवश्यक झाले होते. पण आमच्या घरी, माझे ८८ वर्षे वयाचे वडीलही होते. आम्हाला लक्षणे सुरु झाल्यावर, माझ्या वडिलांना विलगीकरणाच्या दृष्टीने, आम्ही एका खोलीत बंद करून ठेवले होते. आम्हा दोघांशिवाय वडिलांची काळजी घेणारे, त्यांचे खाणे-पिणे बघणारे इतर कोणीच घरात नसल्याने,  मी घरी आल्याशिवाय आनंदला दवाखान्यात दाखल होता येत नव्हते. अशा परिस्थितीत माझा पाच दिवसांचा इंजेक्शन्सचा कोर्स पूर्ण झाल्यावर, डॉक्टरांना माझ्या घरातील अडचण सांगून, मला घरी सोडण्याची विनंती मी केली. सुदैवाने त्या डॉक्टरांनी ती विनंती मान्यही केली. मी घरी आल्यावर आनंद उपचारासाठी दवाखान्यात भरती झाला आणि ७-८ दिवसांच्या उपचारांनंतर तोही घरी परत आला. 

लक्षणे दिसू लागल्यापासून पुढील सुमारे १७ दिवस, कोव्हीड पेशंट त्याच्या श्वासातून कोव्हिडचे विषाणू बाहेर फेकत असतो. त्यामुळे, त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना लागण होऊ शकते. माझ्या वडिलांना लागण होऊ नये म्हणून, आनंदला लक्षणे सुरु झाल्यापासून १७ दिवसांनंतर, आमच्या घराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक झाले होते. पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातर्फे घर, जिने, लिफ्ट व आसपासच्या परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाते, हे आम्ही ऐकून होतो. ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयान्तर्गत, आमच्या प्रभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर,श्री. निखिल शेडगे यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना तशी विनंती केली. श्री. शेडगे यांनी आम्हाला त्वरित श्री. सावंत यांचा दूरध्वनी क्रमांक दिला व त्यांच्यासोबत वेळ ठरवून घेण्यास सांगितले. श्री. सावंत यांच्याशी संपर्क साधून, दुसऱ्या दिवशी सकाळी घर निर्जंतुकीकरणासाठी माणसे पाठवावीत अशी विनंती आम्ही केली. "निश्चित पाठवतो" असे ते म्हणाले असले तरीही कोणी येईल की  नाही, या बाबतीत आम्ही थोडे साशंकच होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी, साधारण ९.३०-१० वाजण्याच्या सुमारास, श्री. सावंत यांच्यातर्फे, श्री. मोरे यांचा फोन आला. ते आमच्या घराजवळ पोहोचले होते व घराचा नेमका पत्ता विचारीत होते. दहा मिनिटांतच श्री. मोरे आणि त्यांचे एक सहकारी घरात हजर झाले. योग्य प्रमाणात औषध व पाणी फवारणी यंत्रात घालणे आणि संपूर्ण घरात त्या मिश्रणाची फवारणी करण्याचे काम पुढील पंधरा-वीस मिनिटांत त्यांनी पूर्ण केले. दोघेही कसलीही कुरकुर न करता, शांतपणे ते काम करत होते. मला त्यांचे कौतुक तर वाटलेच, पण कोव्हीड रुग्ण असलेल्या घरात शिरून तिथे फवारणी करताना या लोकांना स्वतःच्या जीवाची भीती वाटत नसेल का? असा प्रश्नही पडला. 

काम संपवून, श्री. मोरे त्यांच्या सहकाऱ्याबरोबर परत निघाले असता, माझ्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारले.

श्री. मोरे यांनी दिलेले उत्तर ऐकून मी थक्क झाले. 

"मॅडम, आता जवळजवळ वर्ष होत आले. सातत्याने आम्ही हे काम करतो आहोत. मागे एकदा एकाच चाळीत शंभरच्या वर कोव्हीड रुग्ण होते. तिथेही जाऊन आम्ही फवारणी केली होती. नाक आणि तोंड झाकले जाईल असा साधा कापडी मास्क आम्ही वापरतो. सोशल डिस्टंसिंग पाळतो. फवारणी करायला जातो तिथे इकडे-तिकडे कुठेही हात लागणार नाही याची दक्षता घेतो. आजपर्यंत तरी काही झाले नाही"

मला कौतुक वाटले. सहजच ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याची, आणि धडाडीने तिथे घुसून, अतिरेक्यांचा नायनाट करणाऱ्या 'ब्लॅक कॅट' कमांडोजची आठवण झाली. मनात विचार आला, या फवारणी करणाऱ्यांना आपण 'कोव्हीड कमांडोज' असे का म्हणू नये? कोव्हीड पेशंट्सच्या घरात फिरणारे सूक्ष्म विषाणू अतिरेक्यांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडून हे 'कोव्हीड कमांडोज' आपल्या जीवावर उदार होत दररोज कारवाई करत आहेत. 

आम्हा डॉक्टर्सना आणि सिस्टर्सना 'कोव्हीड वॉरियर्स' म्हटले जाते. आमचे भरपूर कौतुक होते आणि सन्मान केला जातो. या 'कोव्हीड कमांडोज'चेही तसेच कौतुक आणि तसाच सन्मान व्हायला हवा असे वाटून, मी मनोमन त्यांच्या कार्याला सलाम केला.


रविवार, ५ जुलै, २०२०

जिंकू किंवा मरू!

आज आपला देश दोन मोठ्या शत्रूंशी लढत आहे. करोना व्हायरसशी देशांतर्गत युद्ध चालू आहे आणि सीमेवर चिन्यांशी. युद्धात जिवावर उदार होऊन लढण्याशिवाय पर्यायच नसतो. मी एक डॉक्टर असल्याने, माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत मी करोनाविरुद्ध लढते आहे. करोना-युद्धभूमीवरील परिस्थिती किती भयाण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आनंद सेवानिवृत्त सेनाधिकारी असल्याने, सीमेवर चालू असलेल्या लढ्यातील, नेमक्या परिस्थितीच्या बातम्या त्याला समजत असतात. सीमारेषेवरही निर्माण झालेली परिस्थिती बिकटच आहे. पण दोन्हीकडे आपले योध्ये अथक लढत देतच आहेत. रोज सकाळी मी मात्र एका वेगळ्याच प्रकारचे निधड्या छातीचे योद्धे बघते आहे. 

मी जवळजवळ रोज पहाटे, कमी रहदारी असलेल्या कॅंटोन्मेंटच्या रस्त्यांवर सायकलस्वारीला किंवा पायी फिरायला बाहेर पडते. भल्या पहाटे रस्त्यांवर खूपच कमी लोक असतात. माझ्या परतायच्या वेळेपर्यंत रस्त्यांवरची रहदारी जरी वाढली तरीही ती तशी कमीच असते. त्यामुळे या काळांत 'सोशल किंवा फिजिकल डिस्टंसिंग' पाळणे सहजी शक्य असते. तरीही, करोनाच्या भीतीने, नाका-तोंडावर घट्ट बसणारा मास्क घालूनच मी फिरते. रोज सकाळच्या माझ्या  फेरफटक्याच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या, मास्कधारी मित्र-मैत्रिणींची ओळख पटल्यावर, मास्क खाली न करता त्यांच्याशी लांबूनच गप्पा मारते.  

सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या ९० % लोकांची, 'करोना व्हायरस' अगदी आळशी असावा अशी पक्की समजूत आहे. किंवा दिवसभर धुमाकूळ घालून दमल्यावर, पुन्हा पहाटे-पहाटे बाहेर पडायला करोनाच्या अंगी त्राणच उरत नसावे, यावर अशा लोकांचा गाढ विश्वास असावा. त्यामुळे, या लोकांनी मास्क घातलेला नसतो. जोडी-जोडीने चालणे, घोळका करून गप्पा मारणे, एकमेकांना टाळ्या देत हास्य-विनोद करणे, हे सगळे मास्क न घालता आनंदात चालू असते. हे बघून कधीतरी माझा संयम सुटतो. मी जवळ-जवळ रोज कोणाला तरी विचारतेच, "तुम्ही मास्क का नाही घातलात?" त्यावर मात्र मला खूपच गमतीदार उत्तरे ऐकायला मिळतात. "खिशात आहे ना, रात्री धुवून वाळत घातला होता पण वाळलाच नाही, सकाळी पोलीस पकडत नाहीत, गाडीतच राहिला, मास्क असला की श्वासाला त्रास होतो", अशी अनेक उत्तरे आणि सबबी तयार असतात.

चार दिवसांपूर्वी, कॅंटोन्मेंटच्या एका रस्त्यावर, तरुण-तरुणींचा एक घोळका दिसला. त्यातल्या एकानेही मास्क घातला नव्हता. त्याबद्दल मी त्यांना लांबूनच हटकले. आम्ही नेमके आर्मीच्या एका ऑफिसच्या समोरच उभे होतो. त्या ऑफिसच्या दारावर आर्मीचे दोन सशस्त्र जवान पहारेकरी उभे होते. त्यांच्याकडे बोट दाखवत त्या घोळक्यातील एकजण मला म्हणाला, "वो गार्ड आप देख रही है ना मॅडम? अपनी सेनापर आपको भरोसा नहीं है क्या? ये अपने वीर जवान तो चिनीयोंको भून देते हैं तो करोना क्या चीज है? आर्मी एरियामें करोनाको ये घुसनेंही नहीं देंगे, मॅडम, आप बेफिक्र रहिये। इधर तो आप करोना से बिल्कूल डरोना।" त्याच्या त्या अत्यंत चटपटीत उत्तरावर सगळा घोळका, एकमेकांना टाळ्या देत खळखळून हसला. मी मात्र डोक्याला हात लावून घेतला. योगायोगाने, पुढच्याच दिवशी, असल्या लोकांच्या बंदोबस्तासाठी, आर्मीने या भागातल्या बऱ्याच रस्त्यांवर सकाळी सहा ते आठ या वेळात सशस्त्र सैनिक उभे केले आहेत. इथे फिरायला येणाऱ्या जाणाऱ्यांना मास्कशिवाय फिरण्यास मज्जाव केला आहे. 

भारताच्या इतिहासात अनेक युद्धे झाली. त्यातली बरीचशी युद्धे हरण्याची कारण म्हणजे आपल्याच शत्रूला जाऊन मिळालेले फितूर लोक! मास्क धारण न करणाऱ्या, 'सोशल किंवा फिजिकल डिस्टंसिंग' न पाळणाऱ्या अशा अनेक फितूर भारतीयांमुळे आपण करोना विरुद्धची लढाई हरणार तर नाही नां? अशा विचाराने आम्हा योध्यांचे मनोबल खचून जाते आहे, हे मात्र खरे!        
     
याच विषयावर RJ  संग्रामने लिहिलेला एक लेख खालील लिंकवर वाचा:-