रविवार, ५ जुलै, २०२०

जिंकू किंवा मरू!

आज आपला देश दोन मोठ्या शत्रूंशी लढत आहे. करोना व्हायरसशी देशांतर्गत युद्ध चालू आहे आणि सीमेवर चिन्यांशी. युद्धात जिवावर उदार होऊन लढण्याशिवाय पर्यायच नसतो. मी एक डॉक्टर असल्याने, माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत मी करोनाविरुद्ध लढते आहे. करोना-युद्धभूमीवरील परिस्थिती किती भयाण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आनंद सेवानिवृत्त सेनाधिकारी असल्याने, सीमेवर चालू असलेल्या लढ्यातील, नेमक्या परिस्थितीच्या बातम्या त्याला समजत असतात. सीमारेषेवरही निर्माण झालेली परिस्थिती बिकटच आहे. पण दोन्हीकडे आपले योध्ये अथक लढत देतच आहेत. रोज सकाळी मी मात्र एका वेगळ्याच प्रकारचे निधड्या छातीचे योद्धे बघते आहे. 

मी जवळजवळ रोज पहाटे, कमी रहदारी असलेल्या कॅंटोन्मेंटच्या रस्त्यांवर सायकलस्वारीला किंवा पायी फिरायला बाहेर पडते. भल्या पहाटे रस्त्यांवर खूपच कमी लोक असतात. माझ्या परतायच्या वेळेपर्यंत रस्त्यांवरची रहदारी जरी वाढली तरीही ती तशी कमीच असते. त्यामुळे या काळांत 'सोशल किंवा फिजिकल डिस्टंसिंग' पाळणे सहजी शक्य असते. तरीही, करोनाच्या भीतीने, नाका-तोंडावर घट्ट बसणारा मास्क घालूनच मी फिरते. रोज सकाळच्या माझ्या  फेरफटक्याच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या, मास्कधारी मित्र-मैत्रिणींची ओळख पटल्यावर, मास्क खाली न करता त्यांच्याशी लांबूनच गप्पा मारते.  

सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या ९० % लोकांची, 'करोना व्हायरस' अगदी आळशी असावा अशी पक्की समजूत आहे. किंवा दिवसभर धुमाकूळ घालून दमल्यावर, पुन्हा पहाटे-पहाटे बाहेर पडायला करोनाच्या अंगी त्राणच उरत नसावे, यावर अशा लोकांचा गाढ विश्वास असावा. त्यामुळे, या लोकांनी मास्क घातलेला नसतो. जोडी-जोडीने चालणे, घोळका करून गप्पा मारणे, एकमेकांना टाळ्या देत हास्य-विनोद करणे, हे सगळे मास्क न घालता आनंदात चालू असते. हे बघून कधीतरी माझा संयम सुटतो. मी जवळ-जवळ रोज कोणाला तरी विचारतेच, "तुम्ही मास्क का नाही घातलात?" त्यावर मात्र मला खूपच गमतीदार उत्तरे ऐकायला मिळतात. "खिशात आहे ना, रात्री धुवून वाळत घातला होता पण वाळलाच नाही, सकाळी पोलीस पकडत नाहीत, गाडीतच राहिला, मास्क असला की श्वासाला त्रास होतो", अशी अनेक उत्तरे आणि सबबी तयार असतात.

चार दिवसांपूर्वी, कॅंटोन्मेंटच्या एका रस्त्यावर, तरुण-तरुणींचा एक घोळका दिसला. त्यातल्या एकानेही मास्क घातला नव्हता. त्याबद्दल मी त्यांना लांबूनच हटकले. आम्ही नेमके आर्मीच्या एका ऑफिसच्या समोरच उभे होतो. त्या ऑफिसच्या दारावर आर्मीचे दोन सशस्त्र जवान पहारेकरी उभे होते. त्यांच्याकडे बोट दाखवत त्या घोळक्यातील एकजण मला म्हणाला, "वो गार्ड आप देख रही है ना मॅडम? अपनी सेनापर आपको भरोसा नहीं है क्या? ये अपने वीर जवान तो चिनीयोंको भून देते हैं तो करोना क्या चीज है? आर्मी एरियामें करोनाको ये घुसनेंही नहीं देंगे, मॅडम, आप बेफिक्र रहिये। इधर तो आप करोना से बिल्कूल डरोना।" त्याच्या त्या अत्यंत चटपटीत उत्तरावर सगळा घोळका, एकमेकांना टाळ्या देत खळखळून हसला. मी मात्र डोक्याला हात लावून घेतला. योगायोगाने, पुढच्याच दिवशी, असल्या लोकांच्या बंदोबस्तासाठी, आर्मीने या भागातल्या बऱ्याच रस्त्यांवर सकाळी सहा ते आठ या वेळात सशस्त्र सैनिक उभे केले आहेत. इथे फिरायला येणाऱ्या जाणाऱ्यांना मास्कशिवाय फिरण्यास मज्जाव केला आहे. 

भारताच्या इतिहासात अनेक युद्धे झाली. त्यातली बरीचशी युद्धे हरण्याची कारण म्हणजे आपल्याच शत्रूला जाऊन मिळालेले फितूर लोक! मास्क धारण न करणाऱ्या, 'सोशल किंवा फिजिकल डिस्टंसिंग' न पाळणाऱ्या अशा अनेक फितूर भारतीयांमुळे आपण करोना विरुद्धची लढाई हरणार तर नाही नां? अशा विचाराने आम्हा योध्यांचे मनोबल खचून जाते आहे, हे मात्र खरे!        
     
याच विषयावर RJ  संग्रामने लिहिलेला एक लेख खालील लिंकवर वाचा:- 

५ टिप्पण्या: